🔴 9 ऑगस्ट 🔴
🎯 विश्व आदिवासी दिवस 🎯
9 ऑगस्ट हा दिवस प्रामुख्याने विश्व आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो.एखाद्या दिवसाला जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सर्वात आधी त्या दिवसाला संयुक्त राष्ट्रांच्या परवानगीची आवश्यकता असते आणि त्या दिवसाचे तेवढे वैश्विक महत्व देखील अधोरेखित करण्याजोगे असायला हवे.
आदिवासी म्हटलं म्हणजे ..वनांत राहणारा ,दऱ्या खोऱ्यात फिरणारा, शिकार करणारा, झाडाची पाने, कंदमुळे, फळे खाणारा अर्धवस्त्र अवस्थेत भटके जीवन जगणारा समुदाय अशी ओळख करून देण्यात येते...आणि काही अंशी ते खरं देखील आहे....कारण आदिवासी समुदाय हा मुख्यतः निसर्गाच्या सानिध्यात राहणारा, निसर्गाशी एकरूप राहणारा, निसर्गातच देवत्व शोधणारा ,शांततामय जीवन जगणारा व अतिशय कमी गरजा असलेला समुदाय आहे.
आदिवासी शब्दाची फोड केल्यास असे लक्षात येते की आदिवासी = आदी + वासी ,यातील आदी म्हणजे खूप आधीचा,पुरातन, खूप जुना आणि वासी म्हणजेच वास करणारा,राहणारा अर्थात रहिवासी.... म्हणजेच जे या भूमीवर सर्वात आधीपासूनचे रहिवास करीत आहेत..अर्थात या भूमीचे खरे मालक आहेत ,मूलनिवासी आहेत. पण याच भौगोलिक अलिप्ततेमुळे आज आदिवासीं बांधवापर्यंत विकासगंगा पोहचली नाही. त्यामुळे आदिवासींमध्ये शिक्षण, आरोग्य, अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा या सारखे अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न निर्माण झालेले दिसतात.
अतिशय बिकट परिस्थितीतही आदिवासींनी कधी निसर्गाची हेंडसांड केली नाही तर पर्यायाने त्यांनी निसर्गाची जोपासनाच केली व आपली वादन, गायन , सामूहिक नृत्य,केशभूषा ,वेषभूषा यातून आपली खास ओळख टिकवत आदिवासी संस्कृतीची जोपासना केली.
प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित रहावी ,प्रत्येक देशाच्या सर्वभौमत्वाचे रक्षण व्हावे आणि 'live and let live' " जागा आणि जगू द्या" या म्हणी प्रमाणे प्रत्येक व्यक्तीस म्हणजे मानव प्राण्यास त्याच्या इच्छेनुसार समाजीकतेचे भान राखत जगण्याचा व त्याची संस्कृती,प्रथा, परंपरा जोपासण्याचा अधिकार आहे..हे प्रथमतः मान्य करण्यात आले आणि त्याच्या रक्षणार्थ संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली.
पण जागतिकीकरण, व्यापारीकरण ,औद्योगिकरण, शहरीकारण होत गेलं आणि पर्यायाने जंगले , वन संपत्तीचा खूपच ऱ्हास झाला आणि त्या वनांत राहणारा आदिवासी समुदाय अडचणीत आला. म्हणून UNO ने लुप्तप्राय होत जाणाऱ्या आदिवासी संस्कृतीची जोपासना व्हावी व आदिवासी संस्कृतीचे अस्तित्व टिकवून राहावे यासाठी 1993 च्या आमसभेत एक ठराव मंजूर करून 9 ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणून पाळण्याचे आदेशीत केले.. आणि त्या दिवसापासून संपूर्ण जगात 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आज भारतात 461 येवढ्या प्रमुख आदिवासी जमातींची नोंद झाली आहे.भारत सरकारने आपल्या देशातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक आरक्षणाची तरतूद करून आदिवासींच्या विकासास हातभार लावला आहे.त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात आदिवासी बांधव उच्च पदांवर विराजमान होऊन देशसेवा करतांना आढळतात.
स्वातंत्र्योत्तर काळातच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आदिवासींनी आपल्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध इंग्रजांच्या विरुद्ध आवाज उठवून लढा दिलेला आढळतो.त्यात प्रामुख्याने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक,तंट्या भिल,बिरसा मुंडा, भागोजी नाईक,खाज्या नाईक इ आदिवासी क्रांतिकारकांचा नामोभिलेख करणे क्रमप्राप्त ठरेल..



No comments:
Post a Comment